नाशिक : बारामतीसाठी सुनेत्रा पवारांची फोनाफोनी; सगळी धडपड पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. Sunetra Pawar
बारामती विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला त्यानंतर त्या काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
ही सगळी राजकीय हालचाल यासाठी की बारामती मतदारसंघातून पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. बारामती मतदारसंघात पवार कुटुंबीयांची मक्तेदारी कायम राहावी, यासाठीच ही धडपड सुरू झाली.
- बारामती वर पवारांचीच मक्तेदारी निर्माण होऊ दिली
वास्तविक बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि तिच्यात मतदान झाले तर सुनेत्रा पवारांच्या पराभव होईल असे नाही, पण त्यांना केवळ निवडणूक लढवून जिंकायची असे नाही, तर बारामती मतदारसंघावर फक्त पवारांचीच मक्तेदारी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करायचे आहे. अर्थात बारामती मतदारसंघावर पवारांची मक्तेदारी निर्माण होण्यात पवार कुटुंबीयांच्या राजकीय कर्तृत्वाचा जेवढा भाग आहे, तेवढाच तो काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यासारख्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांच्या अकर्तृत्वाचा देखील भाग आहे. कारण याच पक्षाच्या नेत्यांनी पवारांशी सकारण किंवा अकारण जुळवून घेऊन त्यांची बारामती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघावर मक्तेदारी निर्माण होऊ दिली.
- भाजपकडून सुद्धा पवारांचे भरण पोषण
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस संघटना पोखरली. त्यातूनच स्वतःचे राष्ट्रवादी काँग्रेस पोसली. तरीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना त्याची लाज वाटली नाही. शरद पवारांसारखा नेता आपला पक्ष पोखरतोय त्याला रोखणे हे आपले महत्त्वाचे काम आहे याची जाणीव सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना झाली नाही. त्यामुळेच शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची बारामती मतदारसंघावर मक्तेदारी निर्माण झाली. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीशी जुळवून घेऊन याच मक्तेदारीचे भरण पोषण केले. भाजपचे बोलघेवडे नेते पवारांविरुद्ध बोलत राहिले पण प्रत्यक्षात त्यांच्याशी आतून हातमिळवणी करत राहिले. त्यामुळे पवारांची मक्तेदारी जास्त टिकून राहिली.
- सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
आता अजित पवारांच्या एक्झिट नंतर काँग्रेसला बारामती मतदारसंघात निवडणूक लढवायची संधी आल्यावर ती संधी सुद्धा हिरावून घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी फोनाफोनी सुरू केली. शरद पवारांनी स्वतःची राज्यसभा खासदारकी पदरात पाडून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी आतून संधान बांधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पापड मोडला. काँग्रेसची सुद्धा राज्यसभा निवडणूक लढवायची संधी हिरावून घेतली.
- काँग्रेसच्या इच्छाशक्तीला तडा द्यायचा "डाव"
त्यांच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना फोनाफोनी करून काँग्रेसच्या निवडणूक लढवायच्या इच्छाशक्तीला छेद द्यायचा "डाव" खेळला. बारामती मतदारसंघात कुठला उमेदवार उभा राहतो हे सुद्धा पवार कुटुंबीयांना सहन होत नाही, हीच पवार कुटुंबीयांची अहंकारी भूमिका यातून स्पष्ट झाली.
- ठाकरे आणि काँग्रेसचा कणा ताठ आहे का??
सुनेत्रा पवारांना तरी बारामती मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध का हवी??, तर त्यांना स्वतःचे नेतृत्व महाराष्ट्रात प्रस्थापित करायचे आहे. ते लढून किंवा संघर्ष करून प्रस्थापित करायचे नाही तर केवळ संघर्षाचा आणि लढायचा आव आणून आणि भाजपच्या सत्तेचा वळचणीचा लाभ घेऊन करायचे आहे. कारण खऱ्या अर्थाने लढणे आणि संघर्ष करणे ही कुठल्याच पवारांची प्रवृत्ती नाही किंबहुना तो त्यांचा घासच नाही. म्हणूनच कोणा कोणी करून बारामतीतली पोटनिवडणूक बिनविरोध करायचा घाट सुनेत्रा पवारांनी घातलाय. त्याला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार असून त्यातूनच ज्ञया दोन्ही घटकांच्या राजकारणाचा कणा ताठ आहे की नाही, हे दिसून येणार आहे.

