Dailyhunt
CM Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला, काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न

CM Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला, काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न

The Focus India 1 week ago

विशेष प्रतिनिधी

मुंबई :CM Fadnavis नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे.

या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी राज्य सरकार कायद्यातील कोणतीही पळवाट (लूपहोल) न ठेवता हा खटला 'फास्ट ट्रॅक'वर चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, जलदगतीने न्याय देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने पीडितेच्या कुटुंबाला लेखी पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही लोक शनिवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन याला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.CM Fadnavis

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.CM Fadnavis

लोकशाहीत भर चौकात फाशी देता येत नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना समजावून सांगितले की, आपल्याला नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्टशीट दाखल होते आणि केस चालणे यासाठी आम्ही हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींना फास्टट्रॅकवर नेत आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांना असे वाटते की, अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. पण तसे लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कुणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कुठलाही लूपहोल न ठेवता, या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा कशी होईल, अशाप्रकारचा संपूर्ण प्रयत्न राज्यशासनाच्या वतीने केला जाईल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तशा संदर्भातील एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे."

काही लोकांचा राजकारणाचा प्रयत्न, पण कुटुंबाचे आभार

शनिवारी रात्री नवले पुलावर झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनामागील राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, "घटना गंभीर आहे. रोष देखील साहाजिक आहे. नागरिकांचा रोष असणे काही चुकीचे नाहीये. पण काही लोक परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की, त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली. सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक पीडितेच्या कुटुंबाला तिथून जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत? हे लक्षात आलेले आहे. पण ठीक आहे. आता त्याबद्दल आपल्याला फार काही करायचे नाहीये. मात्र, मुलीच्या वडिलांनी त्यावेळी जी काही भूमिका घेतली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही या कुटुंबांच्या मागे ताकदीने उभे राहू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र, या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

या घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधकांचाही देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. विरोधकांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. मात्र, टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या कार्यकाळात काय झाले, ते जरा स्वतःत डोकावून पाहावे. ज्यांचा इतिहास 'कॅश फॉर ट्रान्सफर'चा (बदल्यांसाठी पैसे खाण्याचा) आहे, त्या लोकांनी जर आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवण्याचा प्रयत्न केला, तर ते अत्यंत हास्यास्पद आहे."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India