नवी दिल्ली | आजपासून भारत-बांगलादेश संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडू बांगलादेश संघाला कशाप्रकारे सामोरे जातात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
पुढील वर्षी होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. बांगलादेश संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन मॅचफिक्सिंगप्रकरणी अडकल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.
शिखर धवनला पुन्हा एकदा आपली कामगिरी सुधारण्याची या मालिकेत संधी मिळणार आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर अद्याप म्हणावा तसा फॉर्म त्याला गवसलेला नाही. तर मधल्या फळीत राहुल, अय्यर, पांड्या, पंत यांच्यावर भारताची मोठी जबाबदारी असेल.
मालिकेसाठी भारताने विराटला विश्रांती देऊन रोहित शर्माकडे कर्णधारपदाची माळ सोपवली आहे. बांगलादेश संघातदेखील युवा खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजीत दास, रहिम, सरकार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ते बाळगून असतील. सध्या भारतानंतर आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचा संघ म्हणून बांगलादेशकडे पाहिले जात आहे.

