औरंगाबाद। बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना मनसे रोख पाच हजाराचं बक्षिस देणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर मनसेने मुंबईमध्ये बांगलादेशी ,पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेत विविध भागात जाऊन शोध मोहीम घेतली होती.
मनसे आता औरंगाबादमध्ये बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची पुराव्यानिशी माहिती देणाऱ्या नागरिकांना रोख पाच हजारचं बक्षिस देण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे.
नागरिकांनी दिलेली माहिती मनसे कार्यकर्ते पोलिसांना देणार आहेत. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी मनसे शहरातील विविध भागात मंडप उभारणार असून नागरिकांना जर घुसखोरांची माहिती असेल तर कळवण्याचं आवाहन मनसेनं केलं आहे.
दरम्यान, पुण्यातील मोहिमेत आपल्याच देशातील नागरिकांना बांगलादेशी म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे कथित बांगलादेशी भारतीयच असल्याचे सिद्ध झाल्याने मनसेच्या या मोहिमेचा फज्जा उडाला होता.

