पुणे | श्रीलंका दौऱ्यासाठी काल टीम इंडियाची निवड करण्यात आली. कठोर मेहनत आणि संयम यामुळे पिंपरी-चिंचवडकर असलेल्या ऋतुराज गायकवाडची टीम इंडियात निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून टीम इंडियामध्ये निवड होणारा ऋतुराज गायकवाड पहिलाच खेळाडू आहे. 24 वर्षाय ऋतुराजच्या संयमी आणि मेहनती स्वभावानं टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. 13 जुलैपासून भारताची श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 खेळणार आहे.
ऋतुराज गायकवाडच्या यशाचा प्रवास दिवसेंदिवस चांगला होत चालला आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला ऋतुराजला महाराष्ट्राच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र, आयपीएलमध्ये ऋतुराजने चांगली कामगीरी केली. यात त्यानं 2 अर्धशतकं केली, तसच फाफ डु प्लेसिससोबत त्याने चेन्नई सुपरकिंग्सला चांगली सुरुवातही करून दिली.
आयपीएलच्या मागच्या मोसमात लागोपाठ 3 अर्धशतकं केल्यानंतर ऋतुराज प्रकाशझोतात आला, यानंतर त्याच्या कौतुक करण्यात आलं. दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीमध्ये ऋतुराजने क्रिकेटचे धडे गिरवले. वेंगसरकर यांनी ऋतुराजची टीम इंडियात निवड झाल्यानंतर महत्वाचा सल्ला दिला आहे. 'स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे. अशा संधी सहज मिळत नाहीत, त्यामुळे भरपूर आणि सातत्यानं सराव कर,' असं वेंगसरकर यांनी सांगितलं. ऋतुराजने चांगल्या सुरुवातीनंतर मोठा स्कोअर करावा आणि मैदानात शांत राहावं, असा सल्लाही वेंगसरकरांनी दिला आहे.
दरम्यान, भारतासाठी निवड झाल्यामुळं मी आनंदी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करेन, अशी आशा आहे. टीममध्ये निवड होईल का नाही, याबाबत मी फार विचार करत नव्हतो, पण डोक्यात त्या गोष्टी होत्या. आता संधी मिळाली आहे, त्यामुळे देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, असं ऋतुराजनं बोलताना सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या -
भाजपला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला
बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

