नवी दिल्ली | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.
लतादीदींनी दोन नेत्यांना राम मंदिर निर्माणाचं श्रेय दिलं आहे. अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.
मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.

