
मुंबई | मुंबईची जिवनवाहीनी समजली जाणारी मुंबई लोकल ट्रेन ही कोरोनाकाळात सर्वसामान्यांसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यातच कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असताना आता अनेक निर्बंधांमध्ये सुट देत रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली.
मुंबई लोकलच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटकाळात मर्यादीत प्रवासी असल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादीत स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या. पण आता रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा आणि प्रवाशांना दिलासा देण्याची निर्णय घेतला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता लोकल फेऱ्यांची स्थिती पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 95 टक्के सुरू असणाऱ्या लोकलच्या फेऱ्या आता 100 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून मासिक पास काढून रेल्वेने प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.
आता हळूहळू लोकलमधील गर्दी वाढताना पाहायला मिळत असताना रेल्वे प्रशासनाने पुर्वीसारख्या संपुर्ण फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसेच लोकल प्रवास करणाऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.