सोलापूर | पोलिसांनी गाडी अडवल्याच्या घटना आपण नेहमीच बघत असतो. गाडी अडवल्यानंतर कागदपत्रांची मागणी संबंधित पोलीस करतो आणि तुमच्या त्रुटी शोधायला सुरुवात करतो. अशातच एखाद्याला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं. यामुळेच सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवीन आदेश काढला आहे.
राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करायची. मात्र, विनाकारण गाडी थांबवून त्रास देणाऱ्या पोलिसांना आता अधीक्षकांनी चांगलंच बजावलं आहे. जर विनाकारण कोणी गाडी थांबवली तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाकाबंदी करताना संबंधित माहिती ही पोलीस स्टेशनच्या दैनंदिनीमध्ये नोंद करून कंट्रोल रूमला ही त्याची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
विनाकारण कोणत्या वाहनाला आता थांबवायचं असल्यास कंट्रोल रुमची परवानगी घेणंही बंधनकारक केलं आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अंमलदार विनाकारण कोणत्याही वाहनाला थांबवून त्रास देत असल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्यामुळे हे पाऊल उचललं असल्याचं तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं आहे. परराज्यातील वाहने, दुचाकी, चारचाकी यांना आता पोलिसांकडून विनाकारण काही त्रास होत असेल तर त्यांनी खालील क्रमांकावर आपली तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जनतेला केले आहे.
तक्रार क्रमांक- 0217-2732000 , 0217-2732009
व्हॉट्सॲप क्रमांक- 7264885901 , 7264885902
संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असं तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींनाही अजिबात सोडण्यात येऊ नये आणि कडक कायदेशीर कारवाई करावी असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
तेजस्वी सातपुते या स्वतः खोटा चालक पाठवून संबंधित पोलीसांची उलट तपासणी करणार आहेत. त्यामुळे, आता यापुढे पोलिसी खाक्या दाखवून जनतेची लूट करणाऱ्यांची खैर नाही. काही बोटावर मोजण्या एवढ्या लोकांमुळे संपूर्ण पोलीस विभाग बदनाम होतो त्यासाठी ही अंमलबजावणी गरजेची असल्याचं अधीक्षकांनी सांगितलं आहे.

