'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास उलगडला जाणार आहे. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी घेतलेली भूमिका, समाजाचा विरोध आणि शिक्षणासाठी केलेला लढा या मालिकेत सखोलपणे दाखवण्यात येणार आहे.
स्त्री शिक्षणाला पाप मानल्या जाणाऱ्या काळात सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षणाची क्रांती घडवली. मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी घरातून ते रस्त्यापर्यंत मोठा संघर्ष सहन केला. समाजाकडून होणारा अपमान, शेणफेक आणि विरोध यांनाही त्यांनी धैर्याने सामोरं जात आपला निर्धार कधीही कमी होऊ दिला नाही. सावित्रीबाई फुले यांचा विश्वास होता की, प्रत्येक मुलीला शिक्षण मिळायलाच हवं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू असले तरी मनात शिक्षणाचं स्वप्न आणि समाज बदलण्याची जिद्द कायम होती.
सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात स्त्री शिक्षणाचा विचार पुढे नेणं म्हणजे मोठं आव्हान स्वीकारण्यासारखं होतं. समाज बदलण्याची जिद्द आणि 'हे शेणगोळे नाहीत, तर माझ्या कार्याचं कौतुक आहे', अशी त्यांची विचारसरणी त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक ठरली.
संघर्षातून त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली आणि समाजात परिवर्तनाची सुरुवात केली. भिडे वाड्यासारख्या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी इतिहास घडवला.
ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून त्यांनी समाजातील रूढी-परंपरांना आव्हान दिलं. आज त्यांच्या कार्यावर आधारित मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' प्रेक्षकांसमोर त्यांचा संघर्ष पुन्हा जिवंत करत आहे.
या मालिकेत त्यांच्या जीवनातील संघर्ष, वेदना आणि क्रांतिकारी निर्णय उलगडले जात असून सावित्रीबाईंचं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसमोर पोहोचत आहे.
