नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि शुभम यांचा विवाह ८ मे २०२५ रोजी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली. शुभमचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तो पत्नीपेक्षा जास्त वेळ त्या महिलेसोबत घालवत असे. जेव्हा पत्नी लक्ष्मीने या संबंधांना विरोध केला, तेव्हा शुभम तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला.
मृत लक्ष्मीचा भाऊ दीपक कुमार याने आरोप केला आहे की, शुभमने केवळ सामाजिक दबावापोटी हे लग्न केले होते, त्याचे प्रेम आधीपासूनच दुसऱ्या महिलेवर होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी अनेकदा स्थानिक पंचायतीची मदत घेण्यात आली, पण शुभमच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. शेवटी, लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याच्या चार दिवस आधीच त्याने लक्ष्मीचा काटा काढला.
पोलिस तपास आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच भगवानपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (FSL) पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
आरोपीचा शोध
हत्येनंतर आरोपी पती शुभम राज फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की हा केवळ कौटुंबिक वाद नसून एका महिलेच्या आयुष्याचा क्रूर शेवट आहे. आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. या घटनेमुळे रतनपुरा गावात आणि परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

