नेमकी घटना काय?
रोहिणी पाराध्ये या विवाहित होत्या. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ब्रह्मपुरी येथील त्यांच्या स्वतःच्या 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात (पत्राच्या खोलीत) त्यांनी लोखंडी अँगलला गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पती निलेश पाराध्ये यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी निलेश पाराध्ये यांनी पोलिसांत माहिती दिली असून, पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि व्यवसाय
रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय होते. त्यांचे विनोदी, सामाजिक विषयांवरील व्हिडिओ आणि खाद्यपदार्थांचे रिल्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले होते. याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ब्रह्मपुरी येथे 'हॉटेल ग्रामपंचायत' नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय चांगला चालत होता आणि ते हॉटेलच्या नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत होते.
व्यवसाय आणि लोकप्रियता शिखरावर असतानाच रोहिणी यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

