Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Health Watch | मुलांचे आरोग्य सांभाळा.

Health Watch | मुलांचे आरोग्य सांभाळा.

तनिषा ज. कुंदेन

हाराष्ट्रात मान्सूनचे ढग दाटू लागले असून लवकरच पावसाचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ज्ञांनी पालकांना पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणाऱ्या हंगामी आजारांविषयी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

साचलेले पाणी, वाढलेली आर्द्रता, बदलते तापमान तसेच अन्न आणि पाण्याचे दूषित होणे यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्यास पोषक वातावरण तयार होते.

विशेषतः शाळा आणि डे-केअर केंद्रांमध्ये जाणारी मुले पावसाळ्यात अधिक असुरक्षित असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप विकसित होत असल्याने तसेच विषाणू, जीवाणू आणि डासांमुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढल्याने त्यांना आजार पटकन होऊ शकतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हे आजार सामान्य असले तरी योग्य काळजी, स्वच्छता आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.

श्वसनविकार आणि विषाणूजन्य संसर्गात वाढ

ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आरती किणीकर यांच्या मते, पावसाळ्यात श्वसनासंबंधी आजार हे मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या समस्यांपैकी एक आहेत. "या काळात मुलांना सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव आणि विविध विषाणूजन्य संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. या संसर्गांवर योग्य उपचार न झाल्यास किंवा लक्षणे वाढल्यास ते काही वेळा न्यूमोनियासारख्या गंभीर आजारात रूपांतरित होऊ शकतात. हवामानातील अचानक बदल, वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि शाळांमध्ये मुलांचा जवळचा संपर्क यामुळे श्वसनविकार झपाट्याने पसरतात. दम्याचा त्रास किंवा इतर श्वसनविकार असलेल्या मुलांमध्ये या काळात लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे," असे डॉ. किणीकर यांनी सांगितले.

जलजन्य आजारांचा गंभीर धोका

श्वसनविकारांबरोबरच दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे पावसाळ्यात पोटाच्या संसर्गजन्य आजारांचा धोकादेखील वाढतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. उलट्या, जुलाब, पोटाचे संसर्ग, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन) या समस्या पावसाळ्यात मुलांमध्ये वारंवार आढळतात. दूषित पिण्याचे पाणी, अयोग्य पद्धतीने साठवलेले अन्न आणि अस्वच्छ रस्त्यावरील खाद्यपदार्थ हे यामागील प्रमुख कारणे ठरतात.

डॉ. किणीकर यांनी सांगितले की, ''नाले तुंबल्यामुळे किंवा सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाण्याचे स्रोत दूषित होतात. त्यामुळे काविळसारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढतो. पालकांनी मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि ताजे शिजवलेले अन्नच द्यावे. पावसाळ्यात पाण्याचे दूषित होणे ही मोठी समस्या ठरते. वेळेत उपचार न केल्यास काही आजारांमध्ये रुग्णालयात दाखल करावे लागू शकते."

पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढते. बांधकामस्थळे, उघडे नाले, घरांच्या परिसरातील पाण्याची साचलेली भांडी किंवा कंटेनर ही डासांची प्रमुख उत्पत्तीस्थाने बनतात. यामुळे डेंगी आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढतो. हे आजार दरवर्षी सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे आव्हान ठरत आहेत. साचलेले पाणी हे डासांच्या प्रजननासाठी आदर्श ठिकाण असते. पालकांनी घरात आणि परिसरात नियमित पाहणी करून कुंड्या, कुलर, बादल्या, टायर किंवा इतर भांड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी," असा सल्ला डॉ. किणीकर यांनी दिला.

विशेषतः परिसरात डेंगी किंवा मलेरियाचे रुग्ण वाढले असल्यास ताप, अंगदुखी, अशक्तपणा, डोकेदुखी आणि भूक मंदावणे यांसारखी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

Health Watch | वाढती धडधड धोक्याची घंटा…

स्वच्छता आणि पोषण हेच सर्वोत्तम संरक्षण

डॉक्टरांच्या मते, साध्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे पावसाळ्यातील अनेक संसर्ग टाळता येऊ शकतात. मुलांना वारंवार विशेषतः जेवणापूर्वी आणि शाळेतून किंवा बाहेरून घरी आल्यानंतर हात धुण्याची सवय लावावी. वैयक्तिक स्वच्छता राखणे, स्वच्छ कपडे परिधान करणे आणि नखे वेळोवेळी कापणे यामुळेही संसर्गाचा धोका कमी होतो.

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ आणि पीआयसीयू प्रमुख डॉ. पार्थ देवेंद्र दलाल यांनी सांगितले, "पावसाळ्यातील बहुतांश आजार साध्या पण सातत्यपूर्ण खबरदारीमुळे टाळता येतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण विकसित नसल्याने आणि शाळा व मैदानी वातावरणात त्यांचा अधिक संपर्क येत असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे स्वच्छता, डासांपासून संरक्षण, सुरक्षित अन्न-पाणी आणि योग्य पोषण याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे."

तज्ज्ञांनी मुलांना फळे, भाज्या, प्रथिने आणि आवश्यक पोषकतत्त्वांनी समृद्ध संतुलित आहार देण्याचाही सल्ला दिला आहे.

मुले पावसात भिजल्यावर, चिखलात खेळल्यावर काय काळजी घ्यावी?

पावसात भिजणे, पाण्यात खेळणे आणि चिखलात धम्माल करणे मुलांना आवडते. मात्र अशा खेळानंतर त्यांची योग्य स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, पावसात भिजल्यानंतर लगेच ओले कपडे बदलावेत, अंघोळ करावी आणि हात-पाय स्वच्छ धुवावेत. त्यामुळे त्वचेचे संसर्ग आणि बुरशीजन्य आजार टाळता येतात.

"त्वचेवर सतत ओलावा राहिल्यास आणि शरीर व्यवस्थित कोरडे न केल्यास त्वचारोगांचे प्रमाण वाढते. पुरळ, खाज, लालसरपणा किंवा त्वचेतील इतर बदल दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा," असे डॉ. दलाल यांनी सांगितले.

लसीकरण आणि वेळेवर वैद्यकीय उपचार महत्त्वाचे

बालरोगतज्ज्ञांनी मुलांचे नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण असणे आवश्यक असल्याचेही नमूद केले. अनेक प्रतिबंधात्मक आजारांपासून संरक्षण देण्यात लशींची महत्त्वाची भूमिका असते. डॉ. किणीकर म्हणाल्या, "हिपॅटायटिससारख्या आजारांवरील लशी सरकारी तसेच बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच काही परिस्थितींमध्ये बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार टायफॉइड किंवा कॉलरासारख्या आजारांच्या हंगामी लशींचाही विचार करता येतो. मात्र त्या सर्व मुलांसाठी बंधनकारक नाहीत."

डॉक्टरांनी पालकांना इशारा दिला आहे की, सतत येणारा तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, वारंवार उलट्या, लघवीचे प्रमाण कमी होणे, अतिझोप येणे, अन्न-पाणी न घेणे किंवा निर्जलीकरणाची लक्षणे दिसल्यास ती दुर्लक्षित करू नये. वेळेत वैद्यकीय तपासणी आणि उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि लवकर बरे होण्यास मदत होते. पावसाळा जवळ येत असताना जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार हेच मुलांना हंगामी आजारांपासून सुरक्षित ठेवण्याचे सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्वच्छता राखणे, सुरक्षित अन्न-पाणी देणे, डासांची पैदास रोखणे आणि गरज पडल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे यामुळे मुलांचा पावसाळा अधिक निरोगी आणि सुरक्षित होऊ शकतो.

दुर्लक्षित करू नयेत अशी लक्षणे
तीव्र ताप
अंगदुखी
अशक्तपणा
डोकेदुखी
भूक मंदावणे

विशेषतः परिसरात डेंगी किंवा मलेरियाचे रुग्ण वाढले असल्यास ही लक्षणे गंभीरपणे घ्यावीत.

पालकांसाठी पावसाळी सुरक्षा यादी

✔ नियमित हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याची सवय लावा.
✔ उकळलेले किंवा शुद्ध केलेले पिण्याचे पाणी द्या.
✔ ताजे शिजवलेले अन्न द्या; रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळा.
✔ मुलांना पुरेसे पाणी आणि पौष्टिक आहार द्या.
✔ डासांची पैदास रोखण्यासाठी घराजवळ साचलेले पाणी काढून टाका.
✔ डासप्रतिबंधक साधने आणि पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा.
✔ पावसात भिजल्यानंतर लगेच ओले कपडे बदला.
✔ नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण करा.
✔ ताप, श्वास घेण्यास त्रास, उलट्या, जुलाब किंवा निर्जलीकरणाची लक्षणे यावर लक्ष ठेवा.
✔ लक्षणे कायम राहिल्यास किंवा वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror