बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा वेध घेत त्यातील खेळकरपणा, कल्पनाविलास, भावविश्व आणि मानवतेची कोवळी जाणीव काव्यात्म शब्दांत साकार करणारा 'आभाळाच्या गावी' हा मनीषा पाटील हरोलीकर यांचा बालकविता संग्रह लक्षवेधी ठरतो.
समकालीन मराठी कवितेत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कवयित्रीने बालसाहित्याकडे वळताना बालमनाचा निरागस ठाव घेतला असून, त्यांच्या कवितांमधून मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देतानाच शांती, मानवता आणि संवेदनशीलतेचे संस्कारही सहजपणे रुजवले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री डॉ.संगीता बर्वे यांची या संग्रहास प्रस्तावना आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ. बर्वे यांची प्रस्तावना…
समकालीन मराठी कवितेमध्ये गांभिर्याने काव्यलेखन करणाऱ्या मनीषा पाटील हारोलीकर यांनी आता 'आभाळाच्या गावी' या बालकविता संग्रहाच्या निमित्ताने बाल वाङमयामध्ये प्रवेश केला आहे.मराठीमध्ये दर्जेदार बालकविता लिहिणाऱ्या कवींची चांगली परंपरा आहे.या परंपरेमध्ये मराठी कवितेत स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके अशा मान्यवरांनीही उत्तम दर्जाची बालकविता लिहून मराठी बालवाङमय समृद्ध करण्यास हातभार लावला आहे.लेखनाचे गांभीर्य जपत मनीषा पाटील हरोलीकर यांनीही बालकवितांची निर्मिती केली आहे.
'आभाळाच्या गावी' या त्यांच्या बालकविता संग्रहातील कविता ह्या बालमनाचा अनुभव व्यक्त करणाऱ्या आहेत. बालसुलभ निरागसतेबरोबर बालमनामध्ये येणाऱ्या विविध कल्पना, बालमनामध्ये उपस्थित होणारे प्रश्न, बालमनातील कुतूहल हे सारे त्यांच्या कवितेत कलात्मकतेने येते. या दृष्टीने त्यांच्या काही कविता पाहण्यासारख्या आहेत.
'डोळ्यांची नदी' या कवितेत -
'खाऊच खाऊ
फळाचा खाऊ
डोळ्यांची नदी
रोपांना देऊ'
या ओळींमधून लहान मुलांचे खाऊ संबंधीची आवड, त्यातून मिळणारा आनंद,त्यांची कल्पकता यांचे चित्रण येते. मुले विलक्षण कल्पक बुद्धीची असतात त्यांना साध्या साध्या गोष्टींतून मिळणारा आनंद कवयित्रीने नेमका टिपला आहे.
ढगाचा फुगा' या कवितेतून मुलांच्या बालसुलभ वृत्तीचे दर्शन घडते.
'ढगोबा रडे
पडल्या सरी
मायमातीने
घेतले उरी'
मुले आपल्या अनुभवातून पावसाचा अर्थ लावतात,त्यातून मुलांच्या कल्पनाशक्तीचाही प्रत्यय येतो. तर
'आभाळाचे डोळे' या कवितेत-
' सांग ना गं आई जेव्हा
काळे ढग जमतात
आभाळाचे डोळे तेव्हा
तुझ्यासारखे का वाटतात ?'
मुलांनी आईला विचारलेला हा प्रश्न त्यांच्या निरागसतेबरोबर त्यांच्यातील कुतूहलही व्यक्त करणारा आहे.बालमनाच्या अंतरंगात शिरून त्यांच्या अनुभवाला भिडण्याचे कवयित्रीचे सामर्थ्य इथे दिसून येते.
'हास थोडे तरी' ही बालकविता मुलांच्या कल्पनाशक्तीचा विलक्षण अनुभव देणारी आहे.
'आजोबांचा पत्ता
आभाळाच्या घरी
बोट धरून त्यांना
आणेल ही परी'
आजोबांना आभाळातून परी घेऊन येईल,ही कल्पनाच बालसुलभ मनाच्या निरागसतेचा प्रत्येक प्रत्यय देते.मुलांच्या मनात अनेक कल्पना रुंजी घालत असतात.त्या कोणत्यातरी अनुभवाच्या निमित्ताने व्यक्त होतात.मुलांमध्ये रममाण झाल्याशिवाय त्या अनुभवाला येत नाहीत. कवयित्री मुलांच्या जगामध्ये अत्यंत सजगपणाने वावरते, हेच अशा कवितांमधून दिसून येते.
मुलांच्या खेळकरपणाचा, कल्पनाविलासाचा,निरागसतेचा, कुतूहलाचा बालसुलभ अनुभव तर ही कविता देतेच,पण -
'या रे या सारे या,
मानवगीत गाऊया
बुध्दाचे घेऊन डोळे,
विश्वशांती शोधूया'
असे मानवतेचे गीतही गाते. बालमनावर मानवतेचा, शांतीचा संस्कार करणारी ही कविता आहे.मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील अंतरंगाचा शोध आपल्या सर्जनशीलतेने घेऊन बालमनाचा काव्यात्मक आविष्कार करणारी मनीषा पाटील हरोलीकर यांची कविता बालसाहित्यामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करेल,असा विश्वास देणारी आहे.

