Satara News: भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत पक्षरचनेला नवे बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांनी तीन महत्त्वाच्या मोर्चांच्या अध्यक्षांसह विविध आघाड्या व प्रकोष्ठांच्या संयोजकांची घोषणा केली आहे.
या बदलांमुळे पक्षकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
यामध्ये युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी हर्षल चिकणे, किसान मोर्चासाठी सूर्यकांत पडवळ (कराड उत्तर) आणि कामगार मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिल महादेव कुदळे (वाई) यांची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही मोर्चांना जिल्ह्यातील संघटन विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर
याशिवाय, समाजातील विविध घटकांशी संपर्क मजबूत करण्यासाठी अठरा आघाड्या आणि प्रकोष्ठांना नवे संयोजक देण्यात आले आहेत. व्यापारी, वैद्यकीय, ज्येष्ठ नागरिक, भटके-विमुक्त, आरोग्यसेवा, आयटी तसेच उद्योग क्षेत्रातील आघाड्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मिलिंद खामकर, डॉ विरेंद्र घड्याळे, बबनराव कांबळे, विलास आटोळे, विवेक कदम, संजय घारगे, हृदयनाथ पार्टी यांसारख्या कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या फेरबदलात नव्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा समतोल राखत सर्व विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष भोसले यांनी स्पष्ट केले. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही संपूर्ण प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नव्या रचनेमुळे जिल्ह्यात भाजपचा विस्तार अधिक गतीने होईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विविध वरिष्ठ नेते व लोकप्रतिनिधींनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

