Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
४८ मिनिटांत मुंबई ते पुणे!

४८ मिनिटांत मुंबई ते पुणे!

बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार वेग

मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार, ही कल्पनाच काही वर्षांपूर्वी अशक्य वाटत होती. मात्र आता भारताच्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे.

केंद्र सरकारने देशभरात सात नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्यात मुंबई-पुणे मार्गाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर महाराष्ट्रासह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.

सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी रेल्वे किंवा रस्तेमार्गाने साधारण तीन ते चार तास लागतात. एक्सप्रेसवेवर होणारी वाहतूक कोंडी, रेल्वेतील गर्दी आणि वाढणारा प्रवासी ताण यामुळे हा प्रवास अधिकच थकवणारा ठरतो. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. म्हणजेच मुंबईत नोकरी करणारा व्यक्ती सहजपणे पुण्यात राहू शकतो किंवा पुण्यातील उद्योगपती मुंबईत बैठक घेऊन काही तासांत पुन्हा आपल्या शहरात परतू शकतील. यामुळे दोन्ही शहरांमधील आर्थिक, औद्योगिक आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत.

२३ वर्षीय भारतीय वंशाचे तुषार कुमार ठरले ब्रिटनमधील सर्वात युवा महापौर

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील 'गरीब नगर'च्या बेकायदा झोपड्या जमीनदोस्त

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते, तर पुणे आयटी, ऑटोमोबाईल, शिक्षण आणि स्टार्टअप क्षेत्रातील प्रमुख केंद्र आहे. बुलेट ट्रेनमुळे या दोन शहरांतील उद्योगविश्वाला मोठा फायदा होणार आहे. जलद प्रवासामुळे वेळेची बचत होईल, कंपन्यांचा वाहतूक खर्च कमी होईल आणि नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. अनेक कंपन्या मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना एकत्रित आर्थिक पट्टा म्हणून विकसित करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे भविष्यात या मार्गावर नवीन उद्योग, आयटी पार्क, व्यावसायिक केंद्रे आणि निवासी प्रकल्प झपाट्याने उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या गुंतवणुकीमुळे बांधकाम, स्टील, सिमेंट, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. सरकारचा भर 'मेक इन इंडिया'वर असल्याने बुलेट ट्रेनसाठी लागणारे अनेक घटक देशातच तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे भारतीय उद्योगांना मोठी चालना मिळेल आणि स्थानिक उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, जपान, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये हायस्पीड रेल्वे सुरू झाल्यानंतर अल्प अंतराच्या विमान प्रवासावर मोठा परिणाम झाला. भारतातही मुंबई-पुणेसारख्या मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर विमान प्रवासाची मागणी कमी होऊ शकते. कारण विमानप्रवासात विमानतळावर लवकर पोहोचणे, सुरक्षा तपासणी, प्रतीक्षा वेळ आणि शहराबाहेरील विमानतळांपर्यंतचा प्रवास यामुळे बराच वेळ खर्च होतो. त्याउलट बुलेट ट्रेन शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू होऊन वेगवान आणि अधिक सोयीस्कर प्रवास देऊ शकते.

गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेतली आहे. रेल्वेचे वार्षिक भांडवली गुंतवणूक बजेट मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले असून हजारो किलोमीटर रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीलाही वेग मिळत आहे. अशा परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारताच्या आधुनिक वाहतूक व्यवस्थेकडे जाणारा मोठा टप्पा मानला जात आहे.

मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी होणार नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवे पंख मिळणार आहेत. उद्योग, पर्यटन, रोजगार आणि गुंतवणूक या सर्व क्षेत्रांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून हा प्रकल्प राज्यासाठी खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' ठरू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka