२५ वाहनं जळून खाक, चार जणांविरोधात गुन्हा
मुंबई : धारावी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वैमनस्यातून दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल २५ दुचाकी जळून खाक झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी चार जणांविरोधात धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ एप्रिल रोजी पहाटे ३.१० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास धारावीतील आधशिवाई बिल्डिंग क्रमांक ३ परिसरात घडली. फिर्यादी हे गारमेंट व्यवसायिक असून ते गेल्या अनेक वर्षांपासून याच परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी आपली दुचाकी नेहमीप्रमाणे इमारतीसमोर पार्क केली होती.
शिमलाच्या राम मंदिर हॉलमध्ये 'निकाह'चे आयोजन; हिंदू संघटनांचा विरोध
विल्सनच्या १९७६च्या बॅचची झाली रियुनियन, शाळेतल्या आठवणींनी चेहरे फुलले
पवन खेडांच्या घरी धडकले आसाम पोलिस
पहाटे झोप न आल्याने फिर्यादी खाली आले असता, दोन संशयित व्यक्ती प्लास्टिकच्या गोणीतून दुचाकींना आग लावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जाब विचारला असता आरोपींनी धमकी देत 'जशी गाडी जाळली, तसाच तुलाही जाळून टाकू,' अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत अनेक दुचाकी आगीत पूर्णतः जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार आरोपींची ओळख पटली असून त्यांनी जाणीवपूर्वक व वैमनस्यातून ही आग लावल्याचे समोर आले आहे. संबंधित आरोपींमध्ये आयुब उर्फ धिरा शेख, नियाज, अरमान आणि वसीम शेख यांचा समावेश आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

