Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन दिवसांच्या पावसानंतर मुंबईला उसंत; जनजीवन अजूनही मंदावलेले

दोन दिवसांच्या पावसानंतर मुंबईला उसंत; जनजीवन अजूनही मंदावलेले

NEWS डंका 2 weeks ago

लोकल सेवा पूर्ववत, मात्र तिन्ही मार्गांवर विलंब कायम

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर मंगळवारी (७ जुलै) सकाळी मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

मात्र, मागील दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचा परिणाम अद्यापही जनजीवनावर कायम असून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विलंबाने सुरू आहेत. विशेषतः वसई-विरार परिसरातील अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पूर्ववत झाली असली, तरी अनेक गाड्या अद्याप उशिराने धावत आहेत.

रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई रोड ते विरारदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने काही काळ लोकल सेवा स्थगित केली होती. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सेवा पुन्हा सुरू केली असून विरारपर्यंत लोकल धावू लागल्या आहेत. तरीही काही ठिकाणी रुळांवर पाणी असल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहेत आणि काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तिन्ही मार्गांवरील स्थिती काय?

सध्याच्या स्थितीनुसार पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेवरही जवळपास १५ ते २० मिनिटांचा विलंब आहे. हार्बर मार्गावरील सेवा तुलनेने सुरळीत असली तरी तेथेही १० ते १५ मिनिटांचा विलंब होत आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवाशांना अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, नालासोपारा, सफाळे, केळवे, बोईसर, मनोर आणि वाडा परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. तानसा आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, तर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काही भाग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत अपडेट्स तपासाव्यात, अतिरिक्त वेळ राखून प्रवास करावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार रेल्वे सेवा आणि वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येऊ शकतात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

थायलंडमध्ये सापडली २ हजार वर्षे जुनी भारतीय ब्राह्मी लिपी असलेली सोन्याची अंगठी

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

१३ देशांची माघार, भारत खामेनींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

श्रीराम मंदिर देणगी चोरीप्रकरणी चंपतराय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरात दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मिठी नदीसह अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्याने सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील पालघर, रायगड आणि नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, अकोला आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीनंतर नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त केली. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka