Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रेतीच्या ढंगानी राजस्थानचे पाच जिल्हे व्यापले

रेतीच्या ढंगानी राजस्थानचे पाच जिल्हे व्यापले

NEWS डंका 3 weeks ago

पुढील पाच दिवस पाऊस आणि रेतीच्या वादळाचा दुहेरी इशारा

राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उष्णतेनंतर आता हवामानाने अचानक रौद्र रूप धारण केले आहे. याचदरम्यान शनिवारी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये भीषण रेतीचे वादळ धडकले असून अनेक भागांमध्ये दिवसाढवळ्या अंधार पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक विभागांसाठी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार जयपूर, अजमेर, भरतपूर, कोटा, जोधपूर, उदयपूर आणि बीकानेर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस वादळी पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. पश्चिमेकडून सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे वातावरणात मोठा बदल झाला असून अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी गारपीट आणि विजा पडण्याचाही धोका व्यक्त करण्यात आला आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज - शुभमन गिल

बनावट सही प्रकरणी अभिषेक बॅनर्जींना सीआयडीचे समन्स

दरम्यान, शनिवारी राजस्थानच्या श्रीगंगानगर, बीकानेर, हनुमानगड, चुरू आणि सीकर या पाच जिल्ह्यांमध्ये भीषण रेतीचे वादळ आले. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातून आलेल्या या धुळीच्या प्रचंड लोटामुळे अनेक भागांमध्ये दृश्यमानता जवळपास शून्यावर आली. वाऱ्यांचा वेग ६० ते ८० किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला. धुळीचे प्रचंड ढग आकाशात पसरल्याने दुपारच्या वेळेलाही अंधाराचे वातावरण निर्माण झाले आणि वाहनचालकांना दिवे लावून प्रवास करावा लागला.

वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज खांब कोसळले आणि वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. काही भागांमध्ये वाहतूकही विस्कळीत झाली. सोशल मीडियावर या रेतीच्या वादळाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून नागरिकांनी याला गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण धुळीचे वादळ असल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवडाभरापासून राजस्थानमध्ये तापमान ४५ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. श्रीगंगानगर, जैसलमेर, फलोदी आणि बीकानेरसारख्या भागांमध्ये उष्णतेचा तीव्र फटका बसत होता. मात्र आता पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुळीच्या वादळांमुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हवामान विभागाने नागरिकांना विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा, झाडांखाली आश्रय न घेण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस राजस्थानमध्ये हवामानाचा हा बदल कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka