बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चार मुलांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित व्यक्तीने आज सकाळी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर, गावी परत येताना त्याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलिस करत आहेत. घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रीत विजय किराडिया (वय 07 वर्ष), प्राची विजय किराडिया (वय 05 वर्ष), पूर्वी विजय किराडिया (वय 04 वर्षे) आणि पियुष विजय किराडिया (वय 02 वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिथूनच जवळ जाऊन विजय कारडिया याने झाडाला गळफास लावून स्वत: आत्महत्या केली.
एकाच वेळी गावात ५ मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने याचा माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जामोद ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद आणि भांडणं होत होती, यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासामध्ये माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.

