अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते.
या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
संदीप यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर मोठ संकट कोसळलं आहे. आपल्या घरातील एकुलता एक मुलगा निघून गेला याचा दुःख कुटुंबाला झाले आहे. त्यांच्या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. संदिप यांच्या मृत्यूने गावकरी शोकसागरात बुडाले असले तरी गावचा भूमिपुत्र देशासाठी शहीद झाला याचा अभिमान असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहेलगाम येथे पर्यटकांवर 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी एकूण 26 जणांना ठार मारले आणि पुन्हा जंगलात गायब झाले. या घटनेला आता एक महिना झाला आहे, सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु त्या चार क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आलेल नाही. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली, अजून राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या दहशतवाद्यांची माहिती मिळालेली नाही. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली.
गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआयएने 27 एप्रिलपासून अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एजन्सीचे आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे तीन अधिकारी तपासात गुंतले आहेत. एनआयएची एक टीम अजूनही पहलगाम आणि आसपासच्या भागात सतत तपास करत आहे. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
The post महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

