नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत भारताच्या तिन्ही सैन्यदलातील जवानांनी भाग घेतला.
या कारवाईदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे आठ जवान हुतात्मा झाले आहेत. लष्कराने या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सीआयएसएफने हुतात्मा जवानांचे फोटो शेअर करीत, ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांना प्राण गमवावे लागले, अशा शूरवीर जवानांना सीआयएसएफकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. भारत देश जवानांच्या धैर्याचे, शौर्याचे आणि सर्वोच्च बलिदानाचे नेहमीच ऋणी राहील. शोकाकुल कुटुंबांसोबत आमच्या मनापासून संवेदना असतील, असे सीएसआयअफने म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर कारवाईत ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि शस्त्रांच्या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचे ३५ ते ४० सैनिक ठार झाले आहेत. आमची लढाई फक्त आणि फक्त दहशतवाद्यांशी आहे, हे लष्कराने आधीच स्पष्ट केले होते. आम्ही फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले, पाकिस्तानी लष्कराच्या तळांना टार्गेट केले नाही, असेही भारतीय लष्कराने सांगितले आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ६ मे च्या रात्री आणि ७ मे च्या सकाळी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले. यासोबतच या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईनंतर झालेल्या गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कराचे जवान सहभागी होते.
हुतात्मा झालेल्या जवानांची नावे पुढीलप्रमाणे…
१) मुरली नायक,
२) मोहम्मद इम्तियाज
३) दिनेश शर्मा
४) सचिन यादव
५) कमल कंबोज
६) अमित चौधरी
७) सुरेंद्र मोगरा
८) सूरज यादव या शूरवीर जवानांना देशाची सेवा करताना वीरमरण आले.

