Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अनुभवाचा विजय : गॅलिलिओंच्या प्रयोगांनी बदलले जगाचे आकलन

अनुभवाचा विजय : गॅलिलिओंच्या प्रयोगांनी बदलले जगाचे आकलन

गॅलिलिओचे प्रयोग !परंपरेच्या अंधश्रद्धेला आव्हान देत, 'अनुभव आणि प्रयोग हाच सत्याचा पाया' हे जगाला पटवून देणारे गॅलिलिओ गॅलिली हे विज्ञानाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व ठरले.

अरिस्टॉटलसारख्या प्रस्थापित विचारांना प्रयोगांच्या आधारे खोडून काढत त्यांनी केवळ विज्ञानालाच नव्हे, तर विचारस्वातंत्र्यालाही नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयोगांची किंमत त्यांना मोठ्या छळातून मोजावी लागली, पण त्या संघर्षातूनच आधुनिक विज्ञानाची भक्कम पायाभरणी झाली.

डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेत अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. अनुभवाचे विश्लेषण करण्याची क्षमता ज्याच्याकडे असते, तो ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो. तथागत गोतम बुद्ध आपल्या शिष्यांना, अनुयायांना सांगत, 'कोणतही गोष्ट, केवळ मी सांगतो, म्हणून स्विकारू नका. ती तुमच्या अनुभवाला, बुद्धीने तपासून, मी सांगितलेले पटले तरंच मान्य करा.' मात्र जगभर, 'बाबा वाक्यं प्रमाणम्' अशी संस्कृती रूजलेली. आपले महत्त्व वाढवण्यासाठी, 'मी म्हणतो, तेचं खरे', हे आजही मोठ्या प्रमाणात शिष्यांवर, अनुयायांवर बिंबवण्याचा प्रयत्न होतो. आज आपण पृथ्वी गोल आहे, हे शालेय जीवनातच शिकतो. मात्र हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मोठी किंमत एका संशोधकाला मोजावी लागली. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात रूजवण्याचा प्रयत्न करणारे पहिले संशोधक म्हणजे गॅलिलिओ गॅलिली.

गॅलिलिओंच्या जन्मापूर्वी अठराशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वी जन्मलेल्या अरिस्टॉटल यांनी आपल्या चिंतनातून अनेक भाष्ये केली होती. ती मांडणी धर्मग्रंथांना पुरक होती. त्यामध्ये अनुभवांना कसलेच स्थान नव्हते. अनेक मतांना वैज्ञानिक अधिष्ठान नव्हते. मात्र थोरा-मोठ्यांचा शब्द, प्रमाण झाला. तेच शाळा-महाविद्यालयातून शिकवले जात होते. कोपर्निकस, गिल्बर्ट अशा अनेक विचारवंताना अरिस्टॉटल, प्लेटो, टोलेमींची मते चुकीची आहेत, हे लक्षात आले. त्यांनी ग्रंथातून मांडणीही केली. मात्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले नव्हते. गिल्बर्टसारख्या संशोधकांनी अत्यंत संयत भाषेत निष्कर्ष मांडले, तर कोपर्निकस यांनी, ग्रंथ पोप पॉल तृतीय यांना अर्पण करून, आपल्यावर रोष येणार नाही, याची दक्षता घेतली. गॅलिलिओ यांनी मात्र होणाऱ्या परिणामांची भिती न बाळगता, आपले म्हणणे मांडले. एवढेच नाही, तर आपले म्हणण्याची स्वत:च्या डोळ्यांनी खातरजमा करावी, अनुभव घ्यावा, असा आग्रह धरला. विविध ठिकाणी लोकांसमवेत प्रयोग केले.
गॅलिलिओ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी इटलीतील पिसा शहरात झाला. त्यांचे वडील विन्सेन्झो गॅलिली, बंडखोर संगितकार होते. त्यांच्याकडूनच बंडखोरपणा गॅलिलिओ यांच्यात उतरला असावा.

गॅलिलिओ यांनी सुरुवातीचे शिक्षण धार्मिक मठामध्ये घेतले. वडिलांना आपल्या मुलांने डॉक्टर व्हावे, असे वाटत होते. मात्र या शाळेत गॅलिलिओ पूर्णत: विरक्त जीवन जगू लागले. त्यामुळे वडिलांनी त्यांना दुसऱ्या शाळेत घातले. पुढे त्यांना पिसा विद्यापीठामध्ये वैद्यक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र त्यांचे या अभ्यासात लक्ष लागत नव्हते. अखेर त्यांनी वडिलांच्या इच्छेविरूद्ध गणिताच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला.

दरम्यान आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्यांनी पदवी न घेताच शिक्षण सोडून दिले. अर्थर्जनासाठी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थी असताना त्यांनी अरिस्टॉटलच्या विचारांचा अभ्यास केला होता. आता शिकवण्यासाठी पुन्हा अभ्यास करताना हे विचार योग्य नाहीत, असे त्यांना वाटत असे. अभ्यासक्रमानुसार शिकवावे लागत असले तरी आपण मुलांना चुकीचे शिकवतो, असे त्यांचे मत होते. अरिस्टॉटलची मते प्रयोगाच्या सहाय्याने पडताळून पाहणे आवश्यक वाटू लागले.

दुसरीकडे त्यांचे उपकरणे बनवण्यासाठी प्रयोग सुरू होते. यातून त्यांनी एक तराजू तयार केला. यावर 'छोटा तराजू' नावाची पुस्तिका तयार केली. त्यानंतर 'फ्लोरेन्टाईन क्लब'ने 'जगाची रचना' या विषयावर व्याख्यान देण्यास बोलावले. या व्याख्यानाने त्यांना मोठी प्रसिद्धी दिली. त्यांनी गणिताबाबतचे आपले निष्कर्षही एका पुस्तकाद्वारे प्रकाशित केले. यातून त्यांना पिसा विद्यापीठामध्ये नोकरी मिळाली. आर्थिक विवंचना मिटल्याने, आता प्रयोगासाठी, चिंतनासाठी अधिक वेळ मिळू लागला. त्यांना अरिस्टॉटलची मते प्रयोगाधारे पडताळून पहायची होती. पडताळणी करण्यास सोपा विषय निवडला.

अरिस्टॉटल यांच्या मते, 'एक जड आणि एक हलकी वस्तू एकाचवेळी एकाच ठिकाणावरून सोडल्यास जड वस्तू लवकर जमिनीवर पोहोचते. या मताची पडताळणी करण्यासाठी ते पिसाच्या मनोऱ्यावर गेले. तेथून त्यांनी एकाच आकाराचे वेगवेगळ्या वजनाचे दोन चेंडू मनोऱ्यावरून खाली टाकले आणि दोन्ही चेंडू एकाचवेळी जमिनीवर पोहोचले. अरिस्टॉटलचे मत खोटे ठरले. यानंतर त्यांनी आपल्या निरीक्षणावर आधारित 'डी मोटू' नावाचा ग्रंथ लिहिला. यानंतर समाजातील एक मोठा वर्ग, 'गॅलिलिओ स्वत:ला अरिस्टॉटलपेक्षा मोठे मानतात', असे सांगू लागला. त्यांचे म्हणणे खरे की खोटे हे त्यांनी तपासले नाही. या वादामुळे पिसा विद्यापीठाने त्यांच्या नोकरीचे कंत्राट पुढे वाढवण्यास नकार दिला.

पुन्हा गॅलिलिओ आर्थिक संकटात सापडले. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कंपास आणि भौमितीक साहित्य बनवून विकण्यास सुरुवात केली. त्यातून पैसे मिळू लागल्यानंतर त्यांनी पुन्हा संशोधन सुरू केले. दरम्यान हॉलंडच्या संशोधकांनी दुर्बिण तयार केल्याचे आणि ती दूरवरचे, विशेषत: शत्रूच्या हालचाली पाहण्यासाठी वापरत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी एक दुर्बिण मिळवून सुधारणा केल्या. या दुर्बिणीच्या सहाय्याने अंतराळाचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचे गतीविषयक संशोधनही सुरु होते. याच काळात केपलरही याच विषयावर संशोधन करत होते. गॅलिलिओ यांनी केपलर यांना गुप्त पत्र पाठवून त्यांच्या निष्कर्षांशी आपली समीकरणे जुळत असल्याचे कळवले.

गॅलिलिओ यांनी दुर्बिणीमध्ये सुधारणा करून बत्तीस पट अधिक कार्यक्षम बनवली. यातून आकशाचे निरीक्षण केले आणि आपले निष्कर्ष मांडले. सूर्य, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, पृथ्वीही सूर्याभोवती फिरते, असे मत मांडण्यास सुरुवात केली. त्यांनी अरिस्टॉटलचे नाही, तर कोपर्निकसचे म्हणणे खरे असल्याचे प्रयोगातून, निरीक्षणातून सिद्ध केले. त्यांनी चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही. तोही पृथ्वीसारखाच मातीचा, खडकाचा बनलेला आहे, हे ही सांगितले. गुरू ग्रहाला चार उपग्रह असल्याचेही त्यांनी शोधून काढले.

दरम्यान त्यांच्या हितशत्रूनी त्यांच्याविरूद्ध तक्रारी करण्यास सुरुवात केली. 'गॅलिलिओ हे अरिस्टॉटल आणि टोलेमी यांना विरोध करतात आणि कोपर्निकसच्या मतांची पाठराखण करतात', हा त्यांचा मुख्य आरोप होता. यावर गॅलिलिओना तसे न करण्याचे आदेश देण्यात आले. तरीही गॅलिलिओ बधले नाहीत. पुढे त्यांनी अरिस्टॉटल, कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांच्यातील संवादरूपात लिहिलेल्या ग्रंथातून धर्मग्रंथातील मांडणीला थेट आव्हान देणारे लेखन केले. त्यामुळे धर्मपीठे अस्वस्थ झाली. त्यामुळे त्यांच्यावर धर्मपिठासमोर खटला भरण्यात आला. पोप त्यांचे मित्र होते. गॅलिलिओंचे म्हणणे सत्य आहे, हे त्यांना पटत होते. तरीही गॅलिलिओ यांना या धर्मपीठाने देहदंडाची शिक्षा सुनावली. पुढे पोप यांच्या सूचनेनुसार गॅलिलिओंनी माफी मागितली. मात्र तो त्यांनी केलेला तह होता. माफीमुळे शिक्षा नजरकैदेत बदलली. नजरकैदेत असताना त्यांनी एक ग्रंथ लिहिला. तो सार्टी या विद्यार्थ्यासोबत इटलीबाहेर पाठवला आणि त्यातून सत्य जगासमोर मांडले. त्यांना सत्य सांगण्याच्या आग्रहामुळे प्रचंड त्रास सोसावा लागला, तरी या सत्याच्या आग्रहामुळेच ते अजरामर झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari