Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर विजयाचा शिल्पकार अजिंक्य रहाणे निवृत्त

ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर विजयाचा शिल्पकार अजिंक्य रहाणे निवृत्त

NEWS डंका 3 weeks ago

सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत घोषणा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून देणारा अजिंक्य रहाणे याने गुरुवारी (३० जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीला पूर्णविराम दिला. रहाणेने आपल्या संदेशाच्या शेवटी 'Cap 278, signing off' असे लिहित भारतीय कसोटी क्रिकेटला निरोप दिला.

३८ वर्षीय रहाणेने आपल्या संदेशात, 'हा खेळ मला सर्वकाही देऊन गेला. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. आता पुढच्या प्रवासाची वेळ आली आहे,' असे म्हटले. त्याने प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभारही मानले.

अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजय. पहिल्या कसोटीत भारताला अवघ्या ३६ धावांत गुंडाळले गेल्यानंतर आणि विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर रहाणेने संघाची धुरा सांभाळली. मेलबर्न कसोटीत त्याने शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुखापतींनी ग्रासलेल्या संघासह ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला सर करत भारताने २-१ अशी मालिका जिंकली. हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम मालिकांपैकी एक मानला जातो.

रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत त्याने १२ शतके आणि अनेक निर्णायक खेळी करत परदेशातील आव्हानात्मक परिस्थितीत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. लॉर्ड्स, मेलबर्न, वेलिंग्टन आणि किंग्स्टन येथे त्याने झळकावलेली शतके आजही संस्मरणीय मानली जातात.

पौराणिक महाकाव्याचा भव्य अविष्कार; 'रामायण'चा ट्रेलर प्रदर्शित

ऍपल वॉच ठरलं 'लाईफगार्ड'; मालक बेशुद्ध होताच स्वतःहून केला ९११ ला फोन

'पाकिस्तानी काश्मीर' नव्हे, पाकिस्तानव्याप्त काश्मीर!

ट्रम्प-झेलेन्स्की भेटीनंतर रशियाचा कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ला

शांत स्वभाव, संयमी नेतृत्व आणि संकटसमयी संघाला सावरण्याची क्षमता यामुळे रहाणेची ओळख निर्माण झाली. मैदानावरील त्याच्या नेतृत्वशैलीचे अनेक माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी नेहमीच कौतुक केले आहे. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका महत्त्वाच्या पर्वाचा शेवट झाल्याची भावना क्रिकेटविश्वातून व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka