पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे काँग्रेस नेत्यांकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने वेळोवेळी देशासाठी घेतलेल्या भूमिका कौतुकास्पद असल्याचे विधान काही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ऑपरेशन सिंदूर, इराणमधील युद्ध आणि एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जाते. कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, मोदी सरकारने मध्य-पूर्वेतील युद्ध आणि भारतातील इंधन पुरवठ्याची परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर राहुल गांधींपेक्षा वेगळे मत व्यक्त केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका-इस्रायल-इराण युद्धावरील मोदी सरकारच्या राजनैतिक भूमिकेवर वारंवार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या परराष्ट्र धोरणाला 'तडजोड केलेले' म्हटले आहे मात्र, कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी याला 'जबाबदार राजकारण' म्हटले आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनीही एका टीव्ही वृत्तवाहिनीवर पश्चिम आशियातील युद्धावर बोलताना सांगितले की, 'सरकार बहुधा योग्यच करत आहे.' काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते- माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ- यांनी केंद्र सरकारने परिस्थिती हाताळल्याचे कौतुक केले.
आनंद शर्मा यांनी सरकारची प्रशंसा केली आणि एकतेचे आवाहन केले. त्यांनी पश्चिम आशिया संकटाच्या भारताच्या राजनैतिक हाताळणीचे 'परिपक्व आणि कुशल' म्हणून कौतुक केले. कमलनाथ यांनीही एलपीजी परिस्थितीवर काँग्रेसची भूमिका फेटाळून लावली. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व एलपीजी तुटवड्यावरून सरकारवर सातत्याने टीका करत असताना कमलनाथ म्हणाले, 'असा कोणताही तुटवडा नाही. तुटवडा आहे असे केवळ वातावरण तयार केले जात आहे.'
२४ तासांत दोन अमेरिकन लष्करी विमानं पाडली!
भारत-दक्षिण कोरियामध्ये जहाजबांधणी क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी करार
वाढत्या उष्णतेत शरीराला थंडावा देणारा 'खरबूज'! आयुर्वेदात काय म्हटले आहे?
रशियाकडून भारताला ऊर्जा पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव
भाजपच्या नेत्यांनी याच मुद्द्यांवरून आता काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. 'आता तर काँग्रेस नेते कमलनाथ यांनी स्वतःच कबूल केले आहे की देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसची कमतरता नाही,' असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. 'आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लोकांमध्ये भीती आणि अविश्वास निर्माण करणे थांबवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे,' असेही ते पुढे म्हणाले.

