नागपूर : नागपूर-भंडारा महामार्गावर महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोन मामे बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे अशी मृत नवविवाहित युवतींची नावे आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या कार्यक्रमाला निघालेल्या दोघींवर काळाने अचानक घाव घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. नागपूर भंडारा महामार्गावरील महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर पोहोचताच मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
या भीषण अपघातात अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मोनाली घाटोळे यांना तत्काळ उपचारासाठी नागपूरकडे हलवण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच मोनालीनेही प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.
अलिशाचा अवघ्या सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मोनाली घाटोळे यांचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला होणार होता. घरात लग्नाची लगबग सुरू होती, लग्नाची खरेदी आणि तयारी अंतिम टप्प्यात होती. मात्र लग्नाआधीच तिच्या आयुष्याचा अंत झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

