भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने आपल्या विवाहित प्रेयसीला निर्जनस्थळी घेऊन जात तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड राज्याच्या रायपूर जिल्ह्यातील माना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.
वीरू धीवर (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजकुमारी साहू असे हत्या झालेल्या विवाहित युवतीचे नाव आहे. आरोपी वीरू याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत राजकुमारी साहू हिचे इतरांशी होत असलेलं बोलणे आणि त्यांच्या लग्नात निर्माण होणारे अडथळे यातूनच त्याने हे हत्याकांड घडवून आणल्याचं प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
आरोपी वीरू याने प्रेयसी राजकुमारीची हत्या करण्यापूर्वी कट रचला होता. पोलिसांनी आपला शोध घेऊ नये आणि लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपीनं स्वतःचा मोबाईल बंद करून घरी ठेवला होता. पीडितेला घेऊन विमानतळाच्या मागे असलेल्या एका निर्जन रस्त्याकडे नेले. जुन्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. राजकुमारीचा इतरांशी असलेला संपर्क आणि लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमुळे आरोपी आधीपासूनच संतापलेला होता. वाद तीव्र होताच त्याने गाडीच्या डिक्कीतील पेट्रोलची बाटली काढली आणि राजकुमारीच्या अंगावर ओतून तिला थेट पेटवून दिले.
अंगाभोवती आगीचा भडका उडताच राजकुमारी वेदनेनं किंचाळत रस्त्यावर धावू लागली. प्रियकर तिला त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी विमानतळाच्या एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवरवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने घटना पाहिली आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तिचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकही मदतीला धावले आणि त्यांनी आटोक्यात आणली. पोलिसांनी अत्यंत गंभीर अवस्थेत राजकुमारीला रुग्णालयात दाखल केलं; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
राजकुमारी ही मूळची समोदा परिसरातील रहिवासी होती. ८ वर्षांपूर्वी तिचा विवाह आरंग भागातील मोखला येथे झाला होता. तिला दोन मुलंही आहेत. पाच वर्षांपूर्वी तिची ओळख वीरू धीवरशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. २०२१ मध्ये या अनैतिक संबंधांवरून झालेल्या वादात वीरूने राजकुमारीच्या सासूवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी 'हत्येचा प्रयत्न' केल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात जावे लागले होते.
कारागृहामधून सुटल्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. पुढे राजकुमारी पतीपासून वेगळी झाली. गेल्या दीड वर्षांपासून ती शद्दाणी दरबार जवळील एका कॉलनीत नातलगासोबत भाड्याच्या घरात राहून घरकाम करत होती, तर तिची दोन्ही मुलं पतीसोबत राहत होती. या संपूर्ण प्रकरणात माना पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळले अन्…
प्रेमविवाह अन् एका फोनच्या संशयावरून सायलीने गमावला जीव…
पुणे जिल्ह्यात युवकाला पत्नी अन् मुलासमोरच संपवल्याचं कारण आलं पुढे; प्रेमसंबंध…
सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू…
नागपूरमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून दोन गुंड रस्त्यावरच एकमेकांना भिडले अन्…

