कमर्शियल पायलट म्हणून नवी सुरुवात
२०१९ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई संघर्षात पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान पाडून देशभरात चर्चेत आलेले भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी हवाई दलातून निवृत्ती घेतल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आहे.
अभिनंदन वर्धमान यांनी गोवा येथील प्रादेशिक विमान कंपनी FLY91 मध्ये पायलट म्हणून प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले आहे.
माहितीनुसार, जवळपास २२ वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावल्यानंतर वर्धमान यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात FLY91 या खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून काम सुरू केले आहे. मात्र, या संदर्भात अभिनंदन वर्धमान यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. FLY91 कंपनीच्या प्रवक्त्यांनीही कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती खासगी असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
२०१९ च्या हवाई संघर्षामुळे आले चर्चेत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोट येथे हवाई हल्ले केले होते. त्यानंतर २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी विंग कमांडर असलेले अभिनंदन वर्धमान मिग-२१ बायसन विमानातून उड्डाण करत होते. हवाई संघर्षादरम्यान त्यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याची नोंद त्यांच्या वीरचक्र प्रशस्तिपत्रात करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचे मिग-२१ विमानही कोसळले आणि ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते.
'सरकारी शाळांच्या अवस्थेसाठी काँग्रेसवर अधिक राग'
पंजाबच्या मतदार यादीत राघव चड्ढा 'स्थलांतरित'
छोटा राजनच्या नावाने ११ कोटींची खंडणी मागणारी टोळी गजाआड
विमानातून बाहेर पडण्यासाठी पॅराशूटचा वापर केल्यानंतर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यातील भागात उतरले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. जवळपास तीन दिवसांच्या ताब्यानंतर १ मार्च २०१९ रोजी त्यांची भारताकडे सुटका करण्यात आली. या संपूर्ण घटनेदरम्यान दाखवलेल्या धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेसाठी अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. वीरचक्र हा भारतातील युद्धकाळातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

