चहासोबतच जिलेबी, मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता
महाराष्ट्रात साखरेच्या वाढत्या दराने आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन बजेटला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांत साखरेच्या दरात तब्बल २० ते २२ रुपयांची वाढ झाली असून साखरेचा भाव सुमारे ७२ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
घाऊक बाजारातील या दरवाढीची झळ आता किरकोळ बाजारालाही बसू लागली आहे. त्याचा थेट परिणाम चहा, मिठाई, जिलेबी आणि साखरेचा वापर होणाऱ्या इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवर होत आहे.
सर्वसामान्यांच्या दिवसाची सुरुवात ज्या चहाच्या कपाने होते, तो चहाही आता महागला आहे. साखरेसोबत दूध, चहापत्ती आणि व्यावसायिक गॅसच्या खर्चात वाढ झाल्याने चहा विक्रेत्यांच्या खर्चाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर्वी ८ रुपयांना मिळणारा चहा आता १० रुपयांना विकला जात आहे. यवतमाळमध्ये तर १० रुपयांचा कटिंग चहा आता १५ ते २० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
कॉक्रोच दौडा दौडा भागा भागा सा !
राहुल गांधींचे सोनिया गांधींना 'पेलेट गन' मधून कव्हर फायर
साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ चहापुरता मर्यादित नाही. जिलेबी, पेढे, लाडू, मिठाई तसेच बेकरी आणि इतर गोड पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर होतो. त्यामुळे या पदार्थांच्या उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. नागपुरात १० रुपयांचा कटिंग चहा १२ रुपयांपर्यंत पोहोचला असून २४० रुपये किलो असलेली जिलेबी ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. साखरेचा वापर होणाऱ्या पदार्थांच्या किमतीत १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम छोट्या चहा टपरी चालकांवर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर होत आहे. दूध, चहापत्ती, गॅस आणि आता साखर अशा सर्वच घटकांच्या किमती वाढल्याने एका कपामागील नफा कमी होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकण्याशिवाय पर्याय नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, साखरेच्या दरवाढीमागे आगामी सणासुदीतील वाढती मागणी, बाजारातील उपलब्ध साठ्याबाबतची चिंता आणि पुरवठ्यावरील दबाव ही प्रमुख कारणे असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या काळात मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे येत्या काळात साखरेच्या किमतीवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.
साखरेच्या दरवाढीचा फटका आता थेट स्वयंपाकघरापासून चहाच्या टपरीपर्यंत आणि मिठाईच्या दुकानापासून सणासुदीच्या खरेदीपर्यंत जाणवू लागला आहे. त्यामुळे सरकारने बाजारातील साखरेचा साठा, पुरवठा आणि दर यावर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

