धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. पण, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत:ची पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यालाही ठार मारल्याची धक्कादायक घटना बावी गावात घडली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण मारुती जाधव (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन रमी खेळायचा. मात्र, या ऑनलाईन रमीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले होते. त्यामुळे लक्ष्मण जाधव हा नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नसून पोलिस तपास सुरू आहे.
लक्ष्मण मारुती जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी (वय 21) यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता. लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे तो तणावात होता. पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला रविवारी रात्री विष देऊन मारून त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व शक्यता गृहीत धरुन तपास करत आहेत.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.