जळगाव : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ जवळ मंगळवारी (ता. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही मृत्यू झाला आहे.
व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता. हा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी आणि साखरपुड्याचे निमित्त साधून नातेवाइकांना लग्नाची पहिली पत्रिका देण्यासाठी सुरेश महाजन, त्यांच्या पत्नी अनिता, चुलत भाऊ नंदलाल महाजन आणि भावजय निर्मला महाजन हे सर्वजण कारने निघाले होते. कार धुळ्याकडून अमळनेरकडे येत होती.
हॉटेल वृंदावनजवळ, समोरून येणाऱ्या अमळनेर -चाळीसगाव बस आणि दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. यात कारमधील सुरेश, अनिता, नंदलाल आणि निर्मला यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालविणारा त्यांचा पुतण्या गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कारची ज्या दुचाकीला धडक बसली, त्यावरून पशुवैद्य नीलेश सुकदेव तावडे (वय २५, रा. मालपूर, ता. शिंदखेडा) आणि सोनल एकनाथ जावरे (वय २४, रा. सुरत, मूळ गाव धरणगाव) हे दोघे प्रवास करीत होते. त्यांचे लग्न ठरले होते. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत, सुखाच्या गप्पा मारत अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने जात होते. पण समोरून येणाऱ्या महाजन कुटुंबाच्या कारने अमळनेर-चाळीसगाव बसला (क्र. एमएच १४, सीयू ७५४०) आणि नीलेशच्या दुचाकीला (क्र. एमएच १८, सी ८७१९) जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नीलेश आणि सोनल या होणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…

