मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते.
मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला होता. पाकिस्तानमधून आल्यानंतर ते पुन्हा सेवेत रूजू झाले होते. लष्करात राहून १२ वर्षे त्यांनी मातृभूमिची सेवा केली आहे. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ केले आहे. सीमेवर उभे राहून देशसेवा करण्याची इच्छा असतानाही आपल्याला बडतर्फ केले आहे. शिवाय, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पण मिळणार नाही, बँकेचा हप्ता आणि कुटुंब चालवायचे कसे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत. सेवेत पुन्हा दाखल करून घ्यावे, अन्यथा पेन्शन योजना सुरू करावी, अशी चंदू चव्हाण यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले होते.