(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करत असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय? याबाबत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी www.policekaka.com सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चंदू चव्हाण म्हणाले, ‘देशासाठी पाकिस्तानमध्ये तीन महिने २१ दिवस यातना भोगल्या आहेत. लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरात लहान मुलगा आहे. न्यायाची भीक मागण्यासाठी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. पण, जवानांच्या विषयांकडे कोणीही लक्ष देत नाही. माझा लढा हा एकट्यासाठी नाही तर देशातील लाखो जवानांसाठी आहे. देशात जवानांचा सन्मान करण्याचे सोडून उपरे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदर हिला पायघड्या घातल्या जात आहेत. आतंकवाद्यांना मुख्य प्रवाहात घेतले जात आहे. पण, आम्ही देशासाठी लढूनही आम्हाला ना पेन्शन ना कुठे नोकरी मिळत. कारण, लष्करातून बडतर्फ केल्यामुळे खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळत नाही. मग, अशा वेळी करायचे तरी काय? आम्ही देशासाठी लढून असा काय गुन्हा केला आहे, हेच समजत नाही. कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. जवळ पैसे नाहीत, काम करावे तर तेही मिळत नाही. सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. खूप काही प्रश्न आहेत.’