Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघडे करणारी कादंबरी निखळत्या चौकटीत

पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघडे करणारी कादंबरी निखळत्या चौकटीत

पुणे -समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे येथील एस.

एम. जोशी फाउंडेशनमध्ये कादंबरीकार अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत' या रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीवरील परिसंवाद उत्तमरीत्या पार पडला.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने, स्त्री-साहित्याच्या अभ्यासक गीताली वि. म. आणि समीक्षक डॉ. दत्ता घोलप यांनी या परिसंवादात कादंबरीची बलस्थाने उलगडून दाखवणारी अभ्यासपूर्ण मांडणी केली. विशेषतः डॉ. रेखा इनामदार-साने आणि डॉ. घोलप यांची मांडणी समकालीन मराठी कादंबरीत 'निखळत्या चौकटीत'चे स्थान अधोरेखित करणारी आणि मूळ लेखनाला बळकटी देणारी ठरली.

डॉ. दत्ता घोलप : 'निखळत्या चौकटीत' या कादंबरीत प्रौढ, प्रगल्भ आणि समंजस स्त्रीच्या नजरेने आपल्याच भोवतालातील स्त्रियांच्या कहाण्या मांडल्या आहेत. कौटुंबिक चौकटींबरोबरच व्यवस्थेच्या चौकटीही दाखवून त्या ओलांडून पुढील प्रवासाच्या दिशा सूचित करण्याचे काम या कादंबरीने केले आहे. समकालीन स्त्री-लेखनात स्त्री-जीवनाचा हळवा कोपरा येतो; त्यापेक्षा कठोर पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघडे करण्याचे काम या कादंबरीने केले आहे, हीच तिची सर्वांत जमेची बाजू आहे. एकाच स्त्रीच्या वाटचालीपेक्षा समांतरपणे अनेक स्त्रियांच्या जगण्यातून स्त्री-जीवनाचा अवकाश पकडण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

डॉ. गीताली वि. म. यांनी या कादंबरीच्या अनुषंगाने समानतेची वाटचाल, पुरुषांची कुचंबणा आणि कुटुंबव्यवस्थेतील ताणेबाणे यांवर सखोल मांडणी केली.

डॉ. रेखा इनामदार-साने : कादंबरीतील लेखन व्यक्ती आणि समष्टी यांचा समतोल साधणारे आहे. व्यक्त-अव्यक्तातील असंख्य शक्यतांचा वेध घेणारे हे लेखन असून, भाषेचा अतिशय उत्तम प्रयोग येथे दिसतो. कादंबरीची सुरुवात आणि शेवट अतिशय धक्कादायक व ठाम आहे; उगाच 'ओपन-एंडेड' केलेले नाही, हे खूप प्रभावी आहे. शेवटी माणूस अशा एका टप्प्यावर येतो, जिथे कोणीही जिंकत नाही आणि कोणीही हारत नाही; जय-पराजयाच्या पलीकडेही बरेच काही असते, हे अंजली ढमाळ यांनी अत्यंत सुंदररीत्या मांडले आहे.

गो.पू. देशपांडे मेघना पेठे यांच्यावर टीका: या भाषणादरम्यान डॉ. रेखा इनामदार-साने यांनी नाटककार गो. पु. देशपांडे यांची नाटके आणि लेखिका मेघना पेठे यांचे अलीकडील लेखन यांबद्दल परखड मत व्यक्त करून नाराजीही नोंदवली.

यावेळी कादंबरीकार अंजली ढमाळ यांनी कादंबरीच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवली. अजय कांडर यांनी समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे 'कणकवली ते पुणे' हा या कार्यक्रमाचा सांस्कृतिक पूल का बांधला, हे स्पष्ट केले. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रादेशिक बंधन घातले जाऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. तसेच, साहित्यलेखन आणि सांस्कृतिक चळवळ 'लोकल मेंटॅलिटी' व 'लोकल स्पर्धात्मक' विचारांतून बाहेर पडल्याशिवाय उत्तम लेखन शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानच्या पदाधिकारी डॉ. योगिता राजकर, मनीषा शिटावले यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. डॉ. योगिता राजकर आणि मनीषा शिटावले यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रिया निघोजकर यांनी नेमके आणि प्रभावी सूत्रसंचालन केले.

पुणे-मुंबईसारख्या शहरांत कार्यक्रम करताना 'लोक येतील का?' हा प्रश्न नेहमीच भेडसावतो. परंतु या कार्यक्रमाला समाजाच्या विविध स्तरांतील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. त्यात ज्येष्ठ अनुवादक डॉ. दामोदर खडसे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर जीएसटी कमिशनर वैशाली पतंगे, ज्येष्ठ अभ्यासक मुकुंद कुळे, ज्येष्ठ साहित्यिक अंजली कुलकर्णी, इंदुमती जोंधळे, कवी प्रवीण अक्कनवरु, अभिनेते आशुतोष घोरपडे, कवयित्री योजना यादव, ज्येष्ठ संपादक डॉ. विजय चोरमारे, कवी व लेखक श्रीरंजन आवटे, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गिरिजा गोडबोले, मेधा ताडपत्रीकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री संगीता बर्वे, कादंबरीकार बबन मिंडे, सुशील धसकटे, फिल्ममेकर तथा छायाचित्रकार संदेश भंडारे, कथालेखिका सुचिता घोरपडे, संशोधक डॉ. निर्मोही फडके यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता.

भविष्यात भारतीयत्व अधिक सक्षम करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घेण्यासाठी पाहा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari